
कोरोनाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार अपयशी – गिरीश महाजन
जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे. यावेळी जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी निवेदनाद्वारे केली.
एकीकडे संपूर्ण देशात छोटी छोटी राज्य केंद्र शासनाच्या मदतीने कोविड संसर्गावर सक्षम प्रशासनाने, उत्तम समन्वयाने आणि दूरदृष्टीने उपाययोजना करत महामारी आटोक्यात आणताना दिसत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य सरकार या आरोग्य आणीबाणीच्या काळात अकार्यक्षमतेमुळे , निर्णय प्रक्रियेच्या गोंधळामुळे आणि भ्रष्ट कार्यपद्धतीमुळे केंद्रातून मिळणाऱ्या मदतीचा आणि पॅकेजेसचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यास सरकार अपयशी ठरल्याचा आरोप आमदार गिरीश महाजन यांनी केला.
कोविड योद्धे म्हणून जगभर कौतुकास पात्र ठरलेल्या डॉक्टर्स नर्सेस व सर्व आरोग्य सेवक तसेच फ्रंट लाईनवर काम करणारे पोलीस दल, सुरक्षा रक्षक यांच्या आरोग्य हितासाठी केंद्राने पाठवलेले पीपीई किट्स त्यांच्यापर्यंत पोहोचले नाही. हा तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ठरावा इतका गंभीर प्रकार आहे.
सर्वच पातळीवर असमर्थ ठरत असल्याचे वास्तव्य समोर येत आहे. परिणामी महाराष्ट्रातील गोर गरीब जनता, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय नोकरदार व सर्वसामान्य नागरिक मृत्युच्या खाईत लोटला जात आहे. केंद्र शासनाने रेशनवर धान्य उपलब्ध करून देण्याचा आदेश दिला तथापि आपल्या राज्याने तो यशस्वीपणे अंमलात आणला नाही. पारदर्शक ऑनलाईन पद्धत, तक्रार करण्याची टोल फ्री सुविधा, मालवाहतूक ट्रैकिंग सुविधांची कार्यप्रणाली बंद करून एकप्रकारे काळाबाजार आणि भ्रष्टाचाराला पुन्हा रेड कार्पेट असे आमंत्रण दिले.
महाराष्ट्र सरकार कोविड टेस्टमध्ये फेल आहे म्हणूनच या सरकारविरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी ‘ महाराष्ट्र बचाव आंदोलनाची योजना केली आहे. वरील परिस्थिती पाहता कोविड टेस्ट मध्ये महाराष्ट्र सरकार फेल झाल्यामुळे भाजपाच्या शिष्टमंडळाने निषेध व्यक्त केला.
गेल्या आठवड्यात आलेल्या केंद्रीय समितीने दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली नाही. ७६ हजार बेड्सची गरज असताना थातुरमातूर उपाययोजना करून राज्य सरकार जनतेची फसवणूक करत आहे . एवढेच नव्हे तर ठराविक जमावकडून पोलिसांवर वारंवार हल्ले होत असताना सरकार कणखरपणा दाखवत नाही आणि तसे घडू नये म्हणून हिंमत दाखवत नाही हे दुर्दैवी आहे .
केंद्रीय रेल्वे मंत्रालय रेल्वेची उपलब्धता करून देण्यास आग्रही असताना महाराष्ट्र राज्य मागणी करत नाही . नागरी उड्डाण मंत्रालय तयार असताना परदेशी अडकलेले महाराष्ट्रवासी विद्यार्थी , नागरिक राज्यात परत येऊ शकत नाहीत , कारण राज्य सरकार उदासीन आहे . श्रमिकांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याची अतिशय अमानवी व असंवेदनशील नीति राज्य सरकारने अंमलात आणल्याने जगभरात महाराष्ट्र राज्य टीकेस पात्र ठरले . उपाययोजनांचा दुष्काळ , नियोजनाचा अभाव , परिस्थितीकडे डोळेझाक आणि भ्रष्ट प्रशासनाने राज्याची प्रतिमा मलीन झाली . गोर गरीब निराधारांचा आधार असलेल्या श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेद्वारे मिळणारी रक्कमही राज्य शासनाने अजूनही लाभार्थ्यांना वितरित केलेली नाही , भयावह वर्तमानकाळ आणि काळाकुट्ट भविष्यकाळ घोंघावत असताना महाराष्ट्र सरकारने राज्यातील जनतेला दिलासा देणारे एकही पॅकेज , शाञ्चत योजना जाहीर केलेली नाही .
यावेळी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार सुरेश दामू भोळे, माजी आमदार हरिभाऊ जावळे, खासदार उन्मेश पाटील, जि.प. अध्यक्षा रंजना पाटील, आमदार स्मिताताई वाघ, आमदार चंदूभाई पटेल, , माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवानी, आमदार संजय सावकारे, लालचंद पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी आदी उपस्थित होते.