
शिवजयंतीची नियमावली जाहीर; ‘या’ नियमांचं पालन करावं लागणार!
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यातील कोरोनाचे संकट अजुनपर्यंत संपलेले नाही, त्याचे परिणाम विविध सार्वजनिक उत्सवांवर होत आहेत. दरवर्षी उत्साहात साजऱ्या हाेणाऱ्या शिवजयंतीवरही यंदा मर्यादांचे बंधन आले आहे. महाराष्ट्र सरकारने यंदाच्या शिवजयंती सोहळ्यावर बंधनं घालून सर्व शिवप्रेमींना यावर्षी जयंती साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
राज्य सरकारने शिवजयंतीसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार प्रभातफेरी, मोटर-सायकल रॅली, मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
जयंती साजरी करत असताना दहापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, तसेच सार्वजनिक ठिकाणी व्याख्यान, नाटक, पोवाडे व गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाची लस आली असली तरी संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही म्हणून काळजी घेणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आणि पुष्पहार अर्पण करताना त्याठिकाणी एकावेळी एकाच व्यक्तीने उपस्थित राहणे व शक्य असल्यास ऑनलाईन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाने यासंदर्भात जारी केलेल्या नियमावलीचे पालन यंदा सर्व शिवप्रेमींना करावे लागणार आहे.