
राज्यात साधू, संत, महाराज सुरक्षित नाहीत: चंद्रकांत पाटील
उमरी – नांदेड : तालुक्यातील नागठाणा बु. येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा रात्री दीड वाजताच्या सुमारास खून झाला असून या घटनेने भाविकात एकच खळबळ उडाली आहे. गावातीलच एका माथेफिरू तरुणाने महाराजांच्या मठात प्रवेश करून त्यांच्याजवळील ऐवज लुटला त्यानंतर गळा दाबून महाराजांची हत्या केली.
महाराजांच्याच गाडीमध्ये पळून जाण्याच्या बेतात असताना शेजारील लोक जागे झाले म्हणून या आरोपीने पळ काढला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली. लगेच महाराजांचे प्रेत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असून याठिकाणी भाविकांना ही माहिती समजताच एकच खळबळ माजली. मठातील बाथरूममध्ये अन्य एक मृतदेह सापडला असून मयताचे नाव भगवान शिंदे रा. चिंचाळा ता. उमरी असे असल्याचे समजते.
निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांच्या हत्येने धक्का बसला
नांदेड जिल्ह्यात नागठाणा येथील मठाधिपती निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या निर्घृण हत्येने आपल्याला धक्का बसला. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्राच्या वतीने आपण महाराजांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी व्यक्त केली.
चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांनी विविध सेवाकार्याच्या माध्यमातून गावाचा कायापालट केला होता. त्यांनी मठामध्ये अन्नछत्रही सुरू केले होते. त्यांच्याबद्दल सर्व समाजामध्ये आदर होता. महाराजांच्या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शासन करावे, अशी भाजपाची मागणी आहे.
ते म्हणाले की, पालघर जिल्ह्यात पोलिसांच्या साक्षीने जमावाने दोन साधूंची हत्या केली. या घटनेनंतर महिनाभरातच नांदेड जिल्ह्यात मठाधिपतींची व त्यांच्या सहकाऱ्याची मठातच हत्या झाल्यामुळे राज्यात साधू, संत, महाराज सुरक्षित नाहीत असा दुर्दैवी संदेश गेला आहे. मठाधिपतींच्या हत्येबाबत गावकऱ्यांनी ज्या आरोपीबद्दल संशय व्यक्त केला आहे, त्याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे गावकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी वेळीच त्या संशयितावर कारवाई केली असती तर आजचा दुर्दैवी प्रसंग ओढवला नसता, अशी तक्रार आहे. या हत्या प्रकरणात स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालावे आणि दोषींना कठोर शासन होईल यासाठी कारवाई करावी अशी आपली मागणी आहे.