
राज ठाकरेंनी केले ‘या’ तिघींचे कौतुक
कोल्हापूर (तेज समाचार डेस्क): हॉटेल विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचं स्वप्न उरी बळगलेल्या तिघींनी कोल्हापूरमध्ये चक्क पाणीपुरी आणि शिवपुरी गाडी सुरू केली आहे. ऐश्वर्या, श्रद्धा आणि गीता असं त्या महाविद्यालयीन युवतींची नावे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेने (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) ऐश्वर्या, श्रद्धा आणि गीता यांचे कौतुक केले आहे. शिवाय ‘मनसे वृतांत अधिकृत’ या आपल्या फेसबुक पेजवर ऐश्वर्या, श्रद्धा व गीताची यशोगाथा शेअर करून तरुणींना आणखी बळ दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर ‘त्या तिघींची धडपड’ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऐश्वर्या, गीता राजाराम महाविद्यालयात विज्ञान शाखेत (एफ.वाय.) शिकतात तर श्रद्धा डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्किटेक्टच्या दुसऱ्या वर्षाला आहे. शिक्षणावर दुर्लक्ष न करत त्यांनी दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाणीपुरी, शेवपुरीची गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
काका, मामा, दादा, भावा, काकू, मावशी असा ग्राहकांशी संवाद साधत त्यांचा गाडा व्यवस्थित सुरू आहे. कोल्हापुरातील त्या कॉलेज तरुणीची एक धडपड व, आपलं आयुष्य आपण नव्या व आपल्या स्वतःच्या हिमतीवर साध्य करता येते हे या तिघींनी दाखवून दिलं आहे.