
गेल्या 5 हजार वर्षात एकही मशिद तोडली नाही- गडकरी
गेल्या 5 हजार वर्षात एकही मशिद तोडली नाही- गडकरी
नवी दिल्ली (तेजसमचार प्रतिनिधि): भारतात गेल्या 5 हजार वर्षांच्या इतिहासात एकाही हिंदू राजाने कुठलीही मशिद उध्वस्त केली नाही. तसेच कुणाचेही बळजबरीने धर्मांतर देखील केले नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते दिल्ली येथे आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात बोलत होते.
यावेळी गडकरी म्हणाले की, आम्ही मुस्लिम किंवा मुस्लिम संस्कृतीच्या विरोधात नाही. सर्वजण काफिर आहेत या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. आमची संस्कृती संकुचित नाही, जातीयवादी नाही तसेच धर्मांधही नाही. जर भारताला भविष्यात जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्ही सावरकरांना विसरुन गेलात तर भविष्यात चांगले दिवस राहणार नाहीत. मी हे खूपच जबाबदारीने बोलत असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देताना गडकरी म्हणाले की, कोणत्याही धर्माच्या पवित्र स्थानाचा अपमान होता कामा नये. कोणत्याही धर्माच्या माहिला असतील त्यांच्याशी आईसारखा व्यवहार करायला हवा अशी शिकवण छत्रपतींनी आपल्या मावळ्यांना दिली होती. त्याचबरोबर सावरकरांची राष्ट्रवादी विचारांची शिकवण आपल्यासाठी खूपच गरजेची आहे. जर त्याकडे आपण आता लक्ष दिले नाही तर एकदा आपण देशाला दोन तुकड्यात विभागलेलं पाहिलं आहे. जर हेच कायम राहिलं तर आपल्या देशातच नव्हे तर जगात समाजवाद, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता काहीही शिल्लक राहणार नाही नसल्याचे गडकरी यांनी सांगितले.
सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा नाही तर सर्वधर्म समभाव असा आहे. हे हिंदू संस्कृतीचं नैसर्गिक स्वरुप आहे. आम्ही सर्व संस्कृतींचा सन्मान केला आहे. आमचं वैशिष्ट्य हे विविधतेत एकता आहे. आजच्या स्थितीत आपल्याला सर्वसमावेशक, प्रगतीशील असताना खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभावासह पुढे जायचं आहे. मात्र, अल्पसंख्यांकांच किंवा इतर कोणत्याही समुदायाचं लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलर नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.