
“कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नाही”
पुणे (तेज समाचार डेस्क): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचे मुंबईत स्वागत आहे. मात्र कितीही प्रयत्न केलेत तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मुंबई आणि बॉलिवूडचं दुधात साखर विरघळल्यासारखं नात आहे त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी बॉलिवूड वेगळं केलं जाणार नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. बारामतीमध्ये मतदान केंद्रावर सुप्रिया सुळे आल्या होत्या त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 2 डिसेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, कार्यकर्ते आणि संघटना नीट ठेवण्यासाठी सरकार पडणार असल्याचं विरोधक बोलत असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.