
लॉकडाऊनचा गांभीर्याने विचार सुरु ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आता मदत पुनर्वसन मंत्र्यांचा इशारा
मुंबई (तेज समाचार डेस्क): राज्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर असल्याचे चित्र आहे. कारण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांपाठोपाठ आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीदेखील तसा इशारा दिला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशारा आता मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला. ते चंद्रपुरात बोलत होते. यावेळी वडेट्टीवारांनी अमरावती-नागपुरातील वाढत्या रुग्णसंख्येवरुनही चिंता व्यक्त केली.
महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीच्या दिवशी 3800 कोरोनाचे रुग्ण समोर आले आहे . त्यानंतर डिसेंबर, जानेवारीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. परंतु आता फेब्रुवारी महिन्यात पुन्हा एकदा कोरोनचे रुग्ण वाढल्याचे समोर येते . त्यामुळे लोकांमध्ये लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चा आहेत.
मुंबईतील लोकल सेवा सुरू करण्याबाबत दबाव होता हे मान्य करत, आता तिथली रुग्ण संख्या वाढली याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधले. आपत्ती व्यवस्थापनाचे नियम आणि कोरोना नियमावली पालन करण्याची नागरिकांची जबाबदारी आहे. लग्न आणि इतर जाहीर कार्यक्रमात होणारी गर्दी नियंत्रित करण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीने नियम न पाळल्यास अंशतः लॉक डाऊनचा विचार करावाच लागेल याचा पुनरूच्चार वडेट्टीवार यांनी केला.