
50 गुणांची परीक्षा 1 तास वेळ- मंत्री उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती
50 गुणांची परीक्षा 1 तास वेळ- मंत्री उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती
मुंबई (तेज समाचार डेस्क): अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल-कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना शासन परिपत्रक पाठवण्यात आले आहेत. याबाबत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती दिली आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा 50 गुणांची असेल, तर त्यासाठी एक तासाची वेळ असणार आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस या तीन पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार आहे, तसेच परीक्षा घेऊन 31 ऑक्टोबरपर्यंत सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं देखील उदय सामंत यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, काल राज्यपालांशी चर्चा केल्यानंतर आता कुलगुरूंची समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. अकादमी काऊन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागणार आहे, त्यानंतरच परीक्षा आयोगाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवला जाईल.
अशी होईल अंतिम वर्षाची परीक्षा-
–परीक्षेत 1 गुणांचे प्रत्येकी 60 प्रश्न, त्यातील 50 सोडवणे आवश्यक. एक तासाचा वेळ असेल
-50 मार्काचे इंटर्नल व 50 मार्क एक्सटर्नला असणार
-15 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर इंटर्नल परीक्षा तर 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर सर्व विषयाची ऑनलाईन परीक्षा व निकाल
-1 नोव्हेंबरला नवे अॅडमिशन सुरू होणार, 10 नोव्हेंबरला ऑनलाईन शिकवणी सुरू होणार
-90 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा कॉम्प्युटर आहेत, ज्यांच्याकडे या सुविधा नाहीत त्यांना MKCL मार्फत परीक्षा देता येणार.
-कोविड किंवा अपघात जखमी विद्यार्थी असेल तर MKCL मार्फत त्यांची परीक्षा घेण्याची व्यवस्था होणार