
महाराष्ट्राच्या ‘या’ भागातील नागरिकांनी सावध राहा- पुढील तीन दिवस जोरदार पावसाने
मुंबई (तेज समाचार डेस्क): पुढील चार दिवस महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झालेले आहे, पुढील तीन दिवसांत हे क्षेत्र महाराष्ट्रावरून सरकत आहे.
14 आणि 15 तारखेला कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रवास महाराष्ट्रावरून होईल. 16 तारखेच्या सकाळी कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष उत्तर कोकण आणि गुजरात किनारपट्टीजवळ अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यानंतर कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 14 तारखेला काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. 15 आणि 16 तारखेला मुंबईसह कोकणात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.