
पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द; असे दिले जाणार मार्क
मुंबई (तेज समाचार डेस्क): सद्य परिस्थितीत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे शक्य नाहीय. त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये झालेल्या सेमिस्टर परीक्षांच्या आधारावर पास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही महत्वपूर्ण घोषणा केली. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात सरासरी गुण देऊन पास करण्याचा निर्णय व ज्यांना अधिक गुण मिळवायची इच्छा असेल तर यांना भविष्यात परीक्षा देण्याची संधी उद्धव ठाकरे सरकारने दिली आहे.
आजवरच्या सेमिस्टरच्या मूल्यांकनावरुन पदवीचा निकाल लावण्यात येईल अशी घोषणा करताना ज्यांना वाटतं की परीक्षा झाल्यावर आपल्याला जास्त मार्क मिळाले असते. सध्या शासनाच्या निर्णयाने आपल्यावर अन्याय झालाय. अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. त्यांची परीक्षा नंतर घेतली जाईल तशी चर्चा देखील झाली आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
मी मुख्यमंत्री जरी असलो तरी माझ्यातला पालक जिवंत आहे, असं सांगत परीक्षा घेण्याचा जर विचार केला असता तर सगळे नियम पाळणं शक्य झालं नसतं. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.