
पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर!
मुंबई (तेज समाचार डेस्क): गडचिंचले साधू हत्या प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. ठाणे कोर्टाकडून या 47 आरोपीना हा जामीन मिळाला असून काही दिवसांपूर्वी ठाणे कोर्टाने याच प्रकरणातील 58 जणांना जामीन मंजूर केला होता.
साधूंच्या हत्येप्रकरणी एकूण 228 आरोपीना पोलिसांनी अटक केली होती. ज्यामध्ये 12 आरोपींचे वय 18 वर्षाखालील होते. या हत्या प्रकरणात महाराष्ट्र सीआयडीने डहाणू कोर्टात 11 हजार पानांचे दोन स्वतंत्र आरोपपत्र दाखल केलं होतं.
16 एप्रिलच्या रात्री सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या चालकांची गडचिंचले येथे जमावाकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. तसेच पाच पोलिसांना निलंबित करण्यात आलं असून 30 हून अधिक बदल्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान, हे तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनला. हे संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.