
पोलिस पाटील यांना ५० लाख रुपये संरक्षण विमा कवच लागु करावा : बबनराव चौधरी
मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे, जिल्हाधिकारी संजय यादव यांचाकडे मागणी
शिरपूर (तेज समाचार डेस्क): संपूर्ण धुळे जिल्हा सह महाराष्ट्रात कोरोना (कोव्हीड १९) महामारीचा प्रादुर्भाव वाढत असून वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने गाव पातळीवर समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये गाव कामगार पोलीस पाटील हे सदस्य / सचिव म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत. हे कर्तव्य बजावत असताना धुळे जिल्ह्यातील काही पोलीस पाटीलांना कोरोनाची लागण झालेली आहे.
सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग धुळे जिल्हा सह महाराष्ट्रात वेगाने फैलावत आहे. यात पोलीस पाटील आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत असल्यामुळे त्यांना ५० लाख रुपये संरक्षण विम्याचे कवच लागू करण्यात यावे अशी मागणी महा. भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांचाकडे केलेली आहे.
निवेदनात पुढे नमुद केले आहे कि कोरोना (कोव्हीड १९) अंतर्गत काम करणाऱ्या गाव कामगार पोलीस पाटील यांना ५० लाख रुपये विमा संरक्षणामध्ये समाविष्ट करणेबाबत आपणाकडून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी हि महा. भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांचाकडे (दि.२४ सप्टेंबर) रोजी ईमेलने पाठवलेल्या निवेदनातुन केली आहे. निवेदनाची प्रत महा. विधान सभा विरोधीपक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री ना. अनिल देशमुख, पालकमंत्री ना. अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव धुळे यांना हि पाठविण्यात आल्या आहेत.